रविवार, ३० जुलै, २०२३

सरकी खाद्यतेल उद्योगाचे आधुनिकीकरण करण्याची गरज

केंद्र सरकारने खाद्यतेलाच्या बाबत आत्मनिर्भर होण्यासाठी “तेलबिया मिशन” सुरू केले आहे. त्याअंतर्गत २०३० पर्यंत देशातील खाद्यतेल उत्पादन वाढवण्याचे नियोजनआहे. सध्या एकूण गरजेच्या ६०-६५ टक्के आयात होते, ती ३० टक्क्यांपर्यंत खाली आणण्याचे उद्दिष्ट गाठण्यासाठी सरकीच्या तेलाचे उत्पादन वाढवण्याची गरज आहे. भारतात गेली काही वर्षे खाद्यतेलाची मागणी भागवण्यासाठी एकूण गरजेच्या ७० टक्के म्हणजे १४०-१५० लाख टन तेल आयात दरवर्षी केले जात आहे. यातून १५ ते १६ अब्ज डॉलर्सचे (सुमारे १२५ हजार कोटी रुपये) परकीय चलन खर्च केले जाते. तर देशांतर्गत तेलाचे उत्पादन शंभर लाख टन एवढेच होत आहे. त्यामुळे सरकीवर अत्याधुनिक तंत्रज्ञानव्दारे प्रक्रिया करून जास्तीत जास्त तेल उत्पादन करण्याची गरज आहे.

दरडोई वापर सर्वात कमी देशाची लोकसंख्या दरवर्षी दोन टक्क्यांनी वाढत आहे, तर खाद्यतेल वापर तीन टक्क्यांनी वाढत आहे. देशात खाद्यतेलाचा दरडोई वापर सुमारे १७ किलो असून, हे प्रमाण शेजारील देशांपेक्षाही कमी आणि विकसित देशांच्या तुलनेत तर खूपच कमी आहे. तरी देखील ही मागणी पूर्ण करण्यासाठी दरवर्षी किमान १० लाख टन अतिरिक्त खाद्यतेलाची गरज भासते. त्यामुळे खाद्यतेलाच्या बाबतीत स्वंयपूर्ण होण्यासाठी मोहरी, भुईमूग आणि पामचे एकरी उत्पादन आणि गुणवत्ता वाढविण्यावर लक्ष केंद्रित करावे लागेल. याबरोबरच सरकीच्या तेलाचे उत्पादन आणि वापर वाढवण्यावरही भर द्यायला हवा.भारतात सरकी ही सर्वाधिक उत्पादन होणारी तेल बी असली तरी त्यावरील प्रक्रिया उद्योग अजूनही पारंपरिक पद्धतीने चालवला जात असल्यामुळे तुलनेने अकार्यक्षम आहे. परंतु, या उद्योगाचे आधुनिकीकरण केल्यास संपूर्ण मूल्यसाखळीमधून चांगल्या दर्जाचे पशुखाद्य आणि अधिक प्रमाणात खाद्यतेलाचे उत्पादन होईल. त्यातून मूल्यवर्धनाबरोबरच देश खाद्यतेलात आत्मनिर्भर होण्यास बळ मिळेल. तेल आयात कमी होऊन परकीय चलन वाचवणे देखील शक्य होईल. सरकीवरील प्रक्रिया उद्योग अधिक कार्यक्षम झाल्यास त्यातून दरवर्षी किमान ५ ते ६ लाख टन अधिकचे खाद्यतेल उपलब्ध होऊ शकेल, असे सांगितले जाते आहे.

शाळांमध्ये स्मार्टफोनला सरसकट बंदीपेक्षा नियम आखा

शाळांमध्ये स्मार्टफोन वापरावर बंदी असावी, असा अहवाल युनेस्कोने दिला आहे. करोना काळात ऑनलाईन शिक्षण पद्धत तळागाळात रुजल्यानंतर एकूणच शालेय विद्यार्थ्यांचा स्मार्टफोनचा वापर पूर्वीपेक्षाही अधिक वाढला. विद्यार्थ्यांचा वाढलेला स्क्रीन टाइम शिक्षणावर प्रतिकूल परिणाम करीत आहे. त्यामुळे शिक्षणात व्यत्यय येत आहे; तसेच सायबर बुलिंगचे प्रमाणही वाढत आहे, असा निष्कर्ष संयुक्त राष्ट्रांच्या शिक्षण, विज्ञान आणि सांस्कृतिक संस्था असलेल्या ‘युनेस्को’ने एका अहवालात काढला आहे.  नेदरलँड्स, फिनलँड अशा काही देशांनी काही काळापूर्वीच स्मार्टफोनवर बंदी आणलेली आहे. या विषयावर जगभरात विविध विचारप्रवाह असून मोबाइलवर पूर्णतः बंदी आणणे शक्य नसल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.

करोना काळानंतर शिक्षण घेण्यासाठी स्मार्टफोन महत्त्वाचा दुवा बनला होता. मात्र दोन अडीच वर्षात त्यांच्या वापराबाबत मोठा विरोध केला जात आहे. 

मोबाइल ही आजच्या युगात दैनंदिन गरज बनली आहे. बिल भरणे, बुकिंग करणे, करमणूक म्हणून सोशल मीडिया पाहणे, मॅप वापरून इच्छित स्थळी पोहोचणे, एखादी माहिती शोधणे अशा अनेक कामांसाठी आज मोबाइलचा वापर होतो. स्मार्टफोनला वगळून आपली दैनंदिन कामे करणे अनेकांना अवघड वाटू शकते. स्टॅटिस्टा या वेबसाइटच्या माहितीनुसार, जगभरात स्मार्टफोन वापरणाऱ्यांची संख्या २०२३ साली ५२५ कोटींवर पोहोचेल आणि २०२८ पर्यंत या संख्येत वाढ होत राहील.‘बिझनेस लाइन’ने दिलेल्या बातमीनुसार, भारतात चालू वर्षाच्या अखेरीस मोबाइल वापरणाऱ्यांची संख्या १०० कोटींच्या घरात पोहोचण्याची शक्यता आहे. ‘एक्सप्लोडिंग टॉपिक्स’च्या अहवालानुसार, जगातील प्रत्येक माणूस मोबाइलवर रोज सरासरी ३ तास १५ मिनिटे एवढा वेळ घालवतो. भारताच्या बाबतीत बोलायचे झाल्यास भारतात मोबाइलचा सरासरी वापर चार तास पाच मिनिटे एवढा आहे. ‘डेटारिपोर्टल’ने दिलेल्या माहितीनुसार, विकसित देशांपेक्षा विकसनशील किंवा अविकसित राष्ट्रांमध्ये मोबाइलवर वेळ घालविण्याचे प्रमाण अधिक आहे. भारतात शाळांमध्ये मोबाइल न वापरण्यासंबंधी कोणताही कायदा किंवा नियम केले गेलेले नाहीत. सरकारी आणि खासगी शाळांचे व्यवस्थापन त्यांचे स्वत:चे निर्णय घेतात.

 ‘लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स’ने २०१५ साली केलेल्या संशोधनानुसार मोबाइलवर बंदी आणल्यामुळे विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा निकाल चांगला लागत असल्याचे निदर्शनास आले. ज्या विद्यार्थ्यांना कमी गुण मिळत होते, त्यांचाही निकाल चांगला लागत असल्याचे दिसले. “शैक्षणिक असमानता कमी करण्यासाठी शाळांमध्ये मोबाइलचा वापर करण्यास बंदी घालणे, हा कमी खर्चिक आणि सर्वांत उत्तम पर्याय आहे.”, असेही या अभ्यासात नमूद करण्यात आले.

 डिजिटल क्षेत्रात झपाट्याने वाढ होत असताना काहींना ही बंदी अनावश्यक वाटते आहे. स्मार्टफोनमुळे विद्यार्थ्यांना अभ्यासात मदत होते, तसेच त्यांना स्वतःहून काही गोष्टी शिकता येतात, असा बंदीला विरोध करणाऱ्या लोकांचा युक्तिवाद आहे.तसेच, काही ठिकाणी आढळले की, पालकच आपल्या मुलांना शाळेत जाताना मोबाइल देतात. मुलाची सुरक्षितता हा त्यामागील प्रमुख उद्देश असतो.

माजी शिक्षक असलेल्या टेस बर्नहार्ड यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, मोबाइलवर संपूर्ण बंदी आणणे हे न समजण्याजोगे आहे. करोना काळात याच मोबाइलच्या आधारावर विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले. विद्यार्थ्यांनी प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी मोबाइलद्वारे शिक्षकांशी संपर्क साधला. “मोबाइलवर पूर्णतः बंदी आणण्यापेक्षा शाळांनी मोबाइल वापरण्याबाबतचे नियम आखले पाहिजेत. सकारात्मक पद्धतीने मोबाइल वापरण्याची डिजिटल कौशल्ये विद्यार्थ्यांना शिकवत असतानाच त्याचे दुरुपयोग काय असू शकतात, याचीही माहिती त्यांना द्यायला हवी.

मंगळवार, १८ जुलै, २०२३

सायबर सुरक्षेसाठी जागतिक प्रणाली आवश्यक

तंत्रज्ञान ज्या वेगाने जगभर पसरून लोकांचे जीवन सुसह्य करत आहे, त्याच वेगाने त्याचे धोकेही वाढत आहेत. आता ही अतिशयोक्ती म्हणता येणार नाहीच. तंत्रज्ञानाशी संबंधित हे धोके केवळ आर्थिक नुकसान करण्यापुरतेच मर्यादित नसून त्यापलीकडे जाऊन दहशतवाद, विध्वंसक कारवाया आणि अराजकता पसरवून जगातील सर्व देशांची सुरक्षा-सार्वभौमत्व नष्ट करण्याचा दारुगोळा यात पेरला गेला आहे. सायबर हल्ल्यांचे प्रमाण इतके वाढले आहे की आकडा लक्षात ठेवणेही कठीण झाले आहे.

साहजिकच, धोके जितके व्यापक झाले आहेत, तितकी त्यांना तोंड देण्यासाठी अधिक योग्य यंत्रणा तयार करणे आवश्यक आहे.  गृहमंत्री अमित शहा यांनी अलीकडेच 'सायबर आणि आभासी जगाच्या युगातील गुन्हेगारी आणि सुरक्षा' याविषयावर  G-20 परिषदेत बोलताना या धोक्याकडे लक्ष वेधले आहे. ढोबळ अंदाजानुसार, गेल्या चार वर्षांत सायबर हल्ल्यांमुळे जगाला 5.2 ट्रिलियन डॉलरचे नुकसान झाले आहे. आर्थिक नुकसान व्यतिरिक्त जे नुकसान झाले त्याचा तर हिशेबच नाही. ते टाळण्याचा किंवा तोटा भरून काढण्याचा मार्गदेखील सध्या तरी दिसत नाही. भारताने व्यक्त केलेली चिंता अगदी रास्त असून हे संकट सोडवायला जितका वेळ लागेल तितकी परिस्थिती अधिक गुंतागुंतीची होईल.साहजिकच नुकसानही त्याच प्रमाणात वाढणार आहे.  हा रस्ता खडतर आहे कारण तंत्रज्ञानाच्या प्रगतीसह गुन्हेगारीच्या नवीन पद्धतींमुळे पुढील सायबर हल्ला कसा असेल हे कोणालाही सांगता येत नाही. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे सायबर युगात कोणत्याही राज्याच्या किंवा राष्ट्राच्या सीमा पार करणे आता अवघड राहिलेले नाही. जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात बसून कुठेही काहीही करता येते. त्यामुळेच ही गुन्हेगारी आता कोणत्याही एका देशापुरती मर्यादित राहिलेली नाही.  याला सामोरे जाणे हे कोणत्याही एका देशाच्या क्षमतेत नाही.

यासाठी सर्वांचे सहकार्य आणि सामायिक व्यवस्था, ज्याला जागतिक व्यवस्था म्हणता येईल, आवश्यक असेल. जी-20 परिषदेत सर्व देशांनी त्याचा गांभीर्याने स्वीकार केला आहे.या दिशेने पावले लवकरच जगभरात दिसून येतील अशी अपेक्षा करायला हरकत नाही. भारत अनेक मुद्द्यांवर जगाचे नेतृत्व करण्यास सक्षम आहे, असे म्हटले जाते.हे या परिषदेत सिद्धही झाले आहे. भारतीय दृष्टिकोनातूनही ही एक आशादायी परिस्थिती आहे. भारताला धोक्याची प्रथम जाणीव झाली आहे, त्यामुळे धोक्यांचा सामना करण्यासाठीच्या उपाययोजनाही भारतात प्रथम अंमलात आणल्या जातील याची खात्री आहे.