शनिवार, ५ सप्टेंबर, २०२०

संसर्ग टाळण्यासाठी काळजी घ्या; संशय नको


कोरोनाचा संसर्ग मला होणार नाही ना? झाला तर माझ्यामुळे कुटुंबियांना होणार नाही ना, त्यातून मी बरा होईल ना. आरोग्य उपचार व्यवस्थित मिळतील ना. असे अनेक विचार सध्या अनेकांच्या डोक्यात येत असतील. लॉकडाउनमुळे अनेकांचा रोजगार बुडाला आहे. नोकरी गेली आहे. अशातच आता काही व्यावसायिकांना व्यवसाय सुरळीत होईल का? अशा प्रश्नांनी बेचैन करून सोडले आहे, मात्र परिस्थिती गंभीर असली तरी काळजी घेणे हे आपल्या हातात आहे. त्यामुळे संसर्ग टाळण्यासाठी काळजी घ्या. संशय मनात आणू नका. विनाकारण त्रासात पडू नका. संकटाच्या काळात ताणतणाव, चिडचिडेपणा, झोप न येणे असे प्रकार घडत आहेत. यामुळे मानसिक आजार होण्याची शक्यता वाढते. आणि सध्या याचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. मागील काही दिवसांपासून सर्वत्र रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे चिंता आणखी वाढली आहे.याच दरम्यान कौटुंबिक कलहदेखील वाढले आहेत. मार्चपासून सतत या गोष्टी घडत असल्यामुळे अनेकांमध्ये ताणतणाव वाढले आहेत. कोरोनाचे संकट नुसते आरोग्याचे संकट न राहता हे आता आर्थिक आणि मानसिक संकट झाले आहे. बिघडलेली आर्थिक स्थिती कधी सुधारणार आणि पुढे काय करायचे? यामुळे अनेकांची चिंता वाढली आहे. या काळात धीराने आणि संयमाने स्वत:ला आणि कुटुंबाला सावरणे, सांभाळणे महत्त्वाचे आहे. ओढवलेल्या परिस्थितीची जाणीव ठेवून घरातील सर्वांनीच संयम बाळगला पाहिजे. घरातील वातावरण आनंदी, खेळकर ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ही परिस्थिती आणखी काही महिने राहणार आहे, हे उघड आहे. त्यामुळे स्वतःची काळजी घेत समाजात वावरले पाहिजे. सध्याच्या परिस्थितीत प्रत्यक्ष भेटणे जरी शक्य नसले तरी आपल्या जवळच्या मित्रांशी, नातेवाईकांशी फोनच्या माध्यमातून  बोलत राहणे गरजेचे आहे.   ताणतणाव असल्यास किंवा काही अडचणी असल्यास त्या गोष्टी एकमेकांशी बोलल्याने सुटू शकतात. कोणतेही विचार मनात दडवून ठेवणे म्हणजे मानसिक आजारांना निमंत्रण देण्यासारखे आहे. त्यामुळे या काळात विचारांना वाट मोकळी करून देणे गरजेचे आहे. सकारात्मक विचाराबरोबर सकारात्मक गोष्टींचा अवलंब करणे गरजेचे आहे. विशेषतः नकारात्मक बोलणाऱ्या, ताणतणाव देतील, अशा व्यक्तींपासून दूर रहा. सध्या रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन नागरिकांनी करावे. त्याचबरोबर स्वत: स्वत:ची काळजी घ्यावी, ज्यांना मानसिक आजार असतील. त्यांनी एकटे राहू नये तसेच उपचार बंद न करता तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. नकारात्मक घटनांचा जास्त विचार करू नये आणि त्या पाहणेसुद्धा टाळावे. घरातील सर्वांनी मिळून वातावरण आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करावा.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा