मंगळवार, ८ सप्टेंबर, २०२०

जुन्या झाडांचे पुनर्रोपण व्हावे


राज्यात आणि देशात मोठ्या प्रमाणात राष्ट्रीय महामार्गांची कामे सुरू आहेत. मात्र अनेक ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या झाडांची कत्तल करण्यात आल्याने हमरस्ता होऊनही रयाच गेल्याची परिस्थिती आहे. डेरेदार झाडांच्या आकर्षक कमानी, उन्हाळ्यात मिळणारा थंडावा, ऊर्जा देणारा प्राणवायू या गोष्टी आता इतिहासजमा झाल्या आहेत. निसर्गसंपदाच नष्ट झाल्याने फार मोठे आणि भरून न येणारे अपरिमित नुकसान झाले आहे. खरे तर हा निसर्गाचा ठेवा टिकवता आला असता,परंतु प्रशासकीय अनास्था व विकासाच्या नावाखाली होणाऱ्या कत्तलीमुळे महामार्ग उजाड बनत आहे. परदेशात आणि भारतातही अनेक ठिकाणी झाडांच्या पुनर्रोपणाचा यशस्वी झालेला प्रयोग राज्यात सर्वच राष्ट्रीय महामार्गांवर  झाला असता तर बरे झाले असते. प्रशासकीय अनास्थेमुळे झालेले नुकसान एक शल्य म्हणून कायम बोचत राहणार आहे. रत्नागिरी-नागपूरसह राज्यात अनेक महामार्ग बनत चालले आहेत. मात्र यामुळे शेकडो वर्षांपासूनची झाडे सपापस कापली जात आहेत. अर्क महाकाय वृक्षांचा बळी गेला आहे. वास्तविक ही जुनी-पुराणी निसर्गसंपदा ऐतिहासिक ठेवा म्हणून जपला जावा म्हणून निसर्गप्रेमींनीही पुढाकार घ्यायला हवा होता. अजूनही वेळ गेलेली नाही. उर्वरित भागातील जुन्या वृक्षांचे पुनर्रोपण करून हा ऐतिहासिक ठेवा जपला जाऊ शकतो. पण शासनाचे काम,त्याला कोण अडवणार, ही मानसिकता सोडली पाहिजे. सांगली जिल्ह्यातील मिरजजवळील महाकाय वृक्ष वाचवण्यासाठी प्रयत्न झाले. त्याला यश मिळाले. तसे अन्य जुन्या झाडांबाबतही करता येऊ शकते. याशिवाय महामार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर ठेकेदार कंपनीने दुतर्फा झाडे लावावीत ,असा नियम आहे. त्यानुसार महामार्गाला अडथळा येणाऱ्या झाडांचे पुनर्रोपण करता येऊ शकते. ठेकेदारांच्या'हम करे सो कायदा' या वृत्तीमुळे तयार झाडांचा बळी जात आहे. वन विभागही याबाबत मूग गिळून बसल्यासारखी परिस्थिती आहे. शासनाने याकडे लक्ष देऊन पर्यावरण प्रेमी आणि ठेकेदार यांच्या माध्यमातून जुन्या झाडांचे पुनर्रोपण करावे.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा