शनिवार, २ नोव्हेंबर, २०१९

भ्रष्टाचार थांबवण्यासाठी पुढे या


लाचलुचपत मागणार्‍यांवर कारवाई होण्यासाठी त्यांची तक्रार होणे अति आवश्यक असते. लाचलुचपत विभागाला तक्रार प्राप्त झाल्याशिवाय अशा लोकांवर कोणतीही कारवाई करण्यात येत नाही. त्यामुळेच असे लोक बेमालूमपणे लोकांकडून लाच घेऊन त्यांची आर्थिक आणि मानसिक पिळवणूक करतात. अशा भ्रष्ट लोकांना धडा शिकविण्यासाठी लोकांनी पुढे येऊन या भ्रष्टाचाराची तक्रार करणे गरजेचे आहे. तक्रार आल्यावरच संबंधित प्रकरणात कारवाई केली जाऊ शकते. त्यामुळे लोकांनी पुढे यावे. महसूल आणि 'रोहयो'चा विभाग भ्रष्टाचारात नेहमी पहिले स्थान असतो. 2018 मध्येही लाचखोरीमध्ये महसूल विभाग दरवर्षीप्रमाणे यावर्षीही प्रथम स्थानी होता.  महसूल विभागातील भ्रष्टाचाराची २०१ प्रकरणे उघडकीस आली असून २५३ जणांना अटक करण्यात आली आहे. या विभागात सरकारच्या अनेक योजना असून या योजनांचे फायदे मिळवून देण्यासाठी लोकसेवकांकडून लाच घेतली जाते.
रोहयो विभागात  सर्वाधिक ४९ प्रकरणे या वर्षात आतापर्यंत समोर आली आहेत. मात्र आरटीओ, सीटी सर्व्हे आणि एक्साईज विभागात मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे, पण याबाबत लाचलुचपतकडे  अजून एकही तक्रार आलेली नाही. ही अचंबित करणारी बाब आहे.  साहजिकच या विभागातील भ्रष्टाचारावर नियंत्रण मिळविणे या विभागाला अवघड जात आहे.  कायद्यानुसार तक्रारीशिवाय कोणतीही कारवाई करण्याची परवानगी नसल्यामुळे लाचलुचपत विभागाचे हात बांधले जातात.  भ्रष्टाचाराचे निर्मूलन हे लाचलुचपत विभागाचे काम असले तरी त्यासाठी तक्रार होणे आवश्यक आहे. देशातला भ्रष्टाचार थांबवण्यासाठी लोकांनी पुढे यायला हवे.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत  7038121012

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा