शुक्रवार, २७ नोव्हेंबर, २०२०

शून्य शैक्षणिक वर्ष हे फॅड कुणाचे?


वास्तविक ऑनलाइन आणि ऑफलाइन शिक्षण 100 टक्के सुरू असल्याची माहिती सांगली जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातील सर्वच शिक्षकांनी  शासनासह संबंधित प्रशासनाला दिली आहे. आणि काही शिक्षक खरोखरच हे काम चोखपणे आणि प्रामाणिकपणे करत आहेत. या कोरोनाच्या निमित्ताने लाखो व्हिडीओ शिक्षकांनी तयार केले आहेत आणि त्याचा अध्यापनात उपयोग केला जात आहे. मग शिक्षण सातत्याने आणि निरंतर सुरू असताना शिक्षक संघटनांचे पदाधिकारी शून्य शिक्षण वर्ष करण्याबाबत  कोणत्या आधारावर सांगत आहेत? ऑनलाइन शिक्षणासाठी रेडिओ, टीव्ही, गुगल, जिओ यासारखी माध्यमे उपयोगाला आली आहेत. विशेष म्हणजे पहिल्या सत्राचे मूल्यमापन देखील  काही शिक्षकांनी  केले आहे. पहिली-दुसरी इयत्तांची थोडी अडचण येणार असली तरी पुढच्या वर्षी दोन्ही वर्ग एकत्रित घेऊन अभ्यासक्रम पूर्ण करून घेता येईल. यासाठी जादा तास घेता येतील. असंही एकेका शिक्षकाकडे दोन-तीन वर्ग असतातच! अशावेळी अभ्यासक्रम पूर्ण केला जातोच. मग हे वर्ष बुडीत खात्यात घालवण्यापेक्षा पुढच्या वर्षात अभ्यासक्रम पूर्ण करता येणार आहेच. नवीन शैक्षणिक धोरणानुसार पुढच्या वर्गात अभ्यासक्रम पूर्ण करण्यास संधी मिळणार आहे. विद्यार्थी नापास झाले तरी पुढच्या वर्गात जाऊ शकणार आहेत.  मग शून्य शैक्षणिक वर्ष का करायचे? हे कोणाच्या डोक्यातून फॅड आले? संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना यातून काय साध्य करायचे आहे? 9 वी,10 वी बरोबरच महाविद्यालयीन शिक्षण पूर्णपणे ऑनलाइनपणे शिक्षण विद्यार्थी घेत आहेत.  आणि त्यांच्याकडे 100 टक्के मोबाईल उपलब्ध असल्याची आकडेवारी उपलब्ध आहे. कदाचित जानेवारी2021 पासून नियमित शाळा सुरू होऊ शकतील. मे 2021 पर्यंत परीक्षा घेता येऊ शकतील. यासाठी थोडा अभ्यासक्रम कमी करता येईल. कोरोनामुळे अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे, पण सगळेच काही थांबले नाही. कमी-जास्त प्रमाणात सगळं व्यवस्थित सुरू आहे, मग का विद्यार्थ्यांचे एक वर्ष वाया घालवायचं?  का त्यांचे शैक्षणिक नुकसान करायचे? आणि 2020-21 हे वर्ष शून्य शैक्षणिक वर्ष ठेवण्याचा काही शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना अधिकार कुणी दिला.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा