रविवार, ८ नोव्हेंबर, २०२०

भेटीगाठी,प्रवास टाळा,कोरोनाला पळवून लावा


दिवाळीनंतर करोनाचे रुग्ण वाढण्याची शक्यता असल्यामुळे सर्वच स्तरावर सावधगिरीने पावले उचलण्याची आवश्यकता आहे. दिवाळीच्या काळात नागरिकांनी आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे, घराबाहेर पडताना मुखपट्टी लावावी, तसेच भेटीगाठी शक्यतो टाळाव्यात, फटाके उडवण्याचा मोह टाळावा. कोरोना संसर्गाची संख्या झपाट्याने कमी होत असताना आणखी काही दिवस सावधगिरी बाळगल्यास पुढचे चित्र आपल्यासाठी सकारात्मक असणार आहे. मार्च महिन्यापासून आपण एका वेगळ्याच मानसिकतेतून जात आहोत. लॉकडाऊन आणि लोकांच्या सहकार्याने आठ महिन्यानंतर कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी येताना दिसत आहे. या कालावधीत आलेल्या सर्वच सण साजरे करण्यावर निर्बंध आले होते. त्यामुळे दिवाळीच्या सणावरही बंधने बाळगण्याची आवश्यकता आहे. त्याचप्रमाणे फटाक्यांच्या धुरामुळे वातावरण प्रदूषित झाल्यामुळे श्वसनास त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळे यंदा करोनाच्या पार्श्वभूमीवर फटाके फोडण्यावर स्वतःहून निर्बंध  घातले जायला हवेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी निर्बंध घालणार नसल्याचे सांगितले असले तरी दुसऱ्याला त्रास होईल, असे फटाके उडवू नयेत, असे आवाहन केले आहे. आहे.

दिवाळी हा सण सार्वजनिकरीत्या साजरा केला जात नसला तरी यानिमित्ताने लोक मोठय़ा प्रमाणावर एकत्र येत असतात, नातेवाईकांकडे जातात, सार्वजनिक पूजा, स्नेहसंमेलने आयोजित केली जातात. तर अनेक ठिकाणी लोक एकत्र येऊन फटाके फोडतात. दिवाळीच्या पहाटे काही ठरावीक ठिकाणी लोक जमतात. यावर स्वतः लोकांनीच नियंत्रण आणावे लागणार आहे. लोकांना बंधने नको आहेत.आधीच या बंधनाचा त्यांना कंटाळा आला आहे. त्यामुळे सरकार बंधन घालण्याच्या मानसिकतेत नाही.  टाळेबंदी आता जवळपास पूर्णत: शिथिल करण्यात आली आहे. लोकांचा सार्वजनिक क्षेत्रातील वावर वाढलेला आहे. मुखपट्टय़ा लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. हात सतत धुणे किंवा सॅनिटायझर लावणे तसेच सामाजिक अंतर पाळणे हे तीन मुख्य नियम पाळण्याचे सतत आवाहन केले जात आहे. या तीन गोष्टी दिवाळीच्या सणातही लोकांनी पाळण्याचे भान ठेवले पाहिजे. शिवाय एकाच ठिकाणी जास्त काळ थांबू नये. त्याचबरोबर लोकांनी शक्यतो भेटीगाठी टाळायाला हव्यात. गणपती सणानंतर ज्या पद्धतीने रुग्णसंख्या वाढू लागली तशीच परिस्थिती दिवाळीनंतर उद्भवण्याची शक्यता आहे.  दिवाळीच्या पाश्र्वभूमीवर  बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी नागरिक मोठी गर्दी  करत आहेत. यात सरकार, प्रशासन आपली जबाबदारी पार पाडत आहे,पण आता नागरिकांनीच कोरोनाला हद्दपार करण्यासाठी पावले उचलावी लागणार आहेत.  कारण गर्दी पाहता अंतरनियमांचा ग्राहकांना विसर पडल्याचे चित्र होते. ही गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी विशेष खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा