शुक्रवार, १९ नोव्हेंबर, २०२१

युवकांनी सोशल मीडियापासून सावध राहावे


अनेकांना सोशल मीडियावर सक्रिय राहण्याची सवय असते.त्यामध्ये उच्चशिक्षित युवकांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. मात्र या लोकांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की,धार्मिक, राजकीय, देशविरोधी विषयांवर पटकन रीऍक्ट होण्याची सवय आणि भावनेच्या भरात किंवा अनावधानाने का होईना सोशल मीडियावर एकाद्या चुकीच्या पोस्टमुळे संपूर्ण करिअर बरबाद होऊ शकते. त्यामुळे भविष्याचा सारासार विचार करूनच सोशल मीडियावर पोस्ट करावी. सध्या देशात हिंदू, मुस्लिम, शीख, इसाई, दलित अशी धार्मिक-जातीय असे एकमेकांविरोधी असल्याचे वातावरण तयार केले जात आहे. पुढे याचा वापर राजकीय स्तरावर एकागठ्ठा मतांसाठी होतो.तर देश विरोधी लोक या ऑनलाईन माध्यमाने घरबसल्या आपल्या देशातील सामाजिक सहिष्णुता आणि सौहार्द  यांचे नुकसान करतात. देशातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात आणून अराजकाची परिस्थिती निर्माण करून देशाची प्रगती खंडित होईल असा त्यांचा मानस असतो.यात सामान्य माणसाचे आणि देशाचे नुकसान होते.

कुणीतरी माथे भडकवणारी पोस्ट फेसबुक, ट्विटर आणि व्हॉटस अपवर टाकते आणि त्या पोस्टची कोणतीही शहानिशा न करता थेट शेअर करून ते व्हायरल करण्यावर काही बेजबाबदार लोकांचा, युवकांचा भर असतो. त्यावर अनेकांच्या तिखट प्रतिक्रिया असतात.अशा पोस्ट मुद्दामहून व्हायरल करण्यात येतात,जेणेकरून सामाजिक शांतता भंग होईल.त्यामुळे युवा वर्गाने आपली सदसद्विवेकबुद्धी जागृत ठेवावी. आणि अशा पोस्टापासून लांब राहावे. कुणाच्या कटाला बळी पडू नये.

जर एखाद्या उच्च शिक्षित युवकाने सोशल मीडियावर पोस्ट टाकली आणि ती देश विरोधी कारवाया, धार्मिक दंगलीस कारणीभूत, अश्लील, राजकीय द्वेष पसरवणारी असल्यास पोलीस थेट आयटी ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करतात. त्यानंतर युवकाला अटक,जामीन, न्यायालयीन लढाई, सुटका अशा अनेक प्रक्रियेचा सामना करावा लागतो. त्यामुळे तो शासकीय, खासगी नोकरीसाठी पात्र ठरत नाही. कोणत्याही शासकीय मंडळामध्ये त्याला स्थान मिळवता येत नाही. तसेच पासपोर्ट मिळवण्यात अडचणी येतात व विदेश प्रवास करता येत नाही.

विशिष्ट संघटना, काही राजकीय पक्ष किंवा समाजकंटक यांच्या विशेष छुप्या आयटी टीम कार्यरत असतात. त्यांचे केवळ समाज विरोधी, देशविरोधी मजकूर तयार करून सोशल मीडियावर व्हायरल करण्याचे काम असते. त्यांच्या या कटाला युवा वर्ग पटकन बळी पडतो आणि स्वतःचे नुकसान करून घेतो. अशा आक्षेपार्ह पोस्टामुळे समाजाचे-देशाचे नुकसान होत असल्याने अशा पोस्ट दिसून आल्यास त्या ऍपवर जाऊन त्यांचा रिपोर्ट करावा. त्यामुळे अशा आक्षेपार्ह पोस्ट फेसबुक, व्हॉटस अप, इन्स्टंग्राम, ट्विटर यावरून काही मिनिटांतच बंद होऊ शकतात किंवा संबंधित ऍप त्यास बॅन करू शकते.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

बुधवार, १७ नोव्हेंबर, २०२१

कराचे महत्त्व


 देशातील आर्थिक करात (टॅक्स) पारदर्शकता आणण्यासाठी सरकारने जीएसटीसारखा निर्णय घेतला होता, मात्र त्यात काही कमतरता होत्या, त्यामुळे नियमांमध्ये वारंवार बदल करावे लागले.  देशाची आर्थिक व्यवस्था सुधारण्यात करप्रणालीचा मोठा हातभार लागतो, मात्र करप्रणालीत लोकसहभाग वाढवण्यासाठी आणि करप्रणालीबाबत लोकांना जागरूक करण्यासाठी सरकारने प्रयत्न करण्याची गरज आहे.

देशाच्या विकासात सर्व प्रकारच्या करांचा मोठा वाटा आहे किंवा असे म्हणता येईल की कर हा देशाच्या विकासाचा पाया आहे.  कर जमा करून राजेशाही खजिना भरण्याची परंपरा फार जुनी आहे. स्वातंत्र्यानंतर देश चालवण्यासाठी कर महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. ही बाब वेगळी की, आताच्या कर वसुलीच्या प्रक्रियेत तफावत निर्माण झाली आहे.  ही प्रक्रिया सोपी केल्यास सर्वसामान्य जनताही कर भरण्यात रस दाखवेल.

करांच्या कमाईत पारदर्शकता आणण्यासाठी सरकारनेही काही पावले उचलली पाहिजेत, म्हणजे कराच्या कमाईचा ताळेबंद माध्यमांद्वारे लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे.  सरकारने देशातील प्रत्येक नागरिकाला चांगल्या सुविधा उपलब्ध करून दिल्यास, बेरोजगारांना त्यांच्या पात्रता आणि अनुभवानुसार नोकऱ्या उपलब्ध करून दिल्यास,  मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारल्यास,  आणि वृद्धांचा वृद्धापकाळ सुरक्षित ठेवण्याचे गांभीर्य दाखवल्यास  देशातील सामान्य माणूसदेखील खुशी खुशी कर भरायला तयार होईल. सरकार गंभीर असेल तर सामान्य लोकदेखील गांभीर्य दाखवतील.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

गुजरात अंमली पदार्थांच्या तस्करीचे केंद्र


गेल्या काही दिवसांपासून गुजरातमधून अमली पदार्थ जप्त केल्याच्या आणि काहींना अटक झाल्याच्या बातम्या येत आहेत.  शिवाय, नुकत्याच मुंबईत एका क्रूझ जहाजातून अमली पदार्थ जप्त केल्याच्या प्रकरणाने या प्रश्नाकडे संपूर्ण देशाचे लक्ष वेधले आहे.  परवा सोमवारी गुजरातमधील दहशतवादविरोधी पथकाने सव्वाशे किलोग्राम हेरॉईन जप्त केले आणि तीन जणांना अटक केली.  आंतरराष्ट्रीय बाजारात एवढ्या मोठ्या प्रमाणात करण्यात आलेल्या कारवाईतील हेरॉईनची किंमत सहाशे कोटींहून अधिक असल्याचे सांगण्यात येत आहे.  यापूर्वी गेल्या काही दिवसांत गुजरात पोलिसांनी अंमली पदार्थांच्या दोन मोठ्या खेपा जप्त केल्या होत्या.
त्याच वेळी गुजरात दहशतवादविरोधी पथकाने 2016 पासून आतापर्यंत एकोणीस हजार कोटी रुपयांहून अधिक किमतीचे अंमली पदार्थ जप्त केले आहेत.  त्यातच यावर्षी नऊशे कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले.  या दरम्यान सत्तरहून अधिक जणांना अटकही करण्यात आली.  गुजरातमधील मुंद्रा बंदरातूनच सुमारे तीन हजार किलो अमली पदार्थ जप्त करण्यात आले.  छुप्या गुन्हेगारी कारवाया आणि प्रत्येक स्तरावर पाळत ठेवल्याचा दावा करणाऱ्या सरकारच्या आणि त्याच्या पोलिसांच्या डोळ्यांसमोर इतक्या मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थांच्या तस्करीचे जाळे कसे उभं राहिले, हा प्रश्नच आहे!
 गुजरातची किनारपट्टी हा पाकिस्तान, इराण किंवा अफगाणिस्तानमधून भारतात करण्यात येणाऱ्या अंमली पदार्थांच्या तस्करीसाठी पसंतीचा मार्ग बनला आहे.  तस्कर पाकिस्तानातून कच्छ किंवा गुजरातमधील भुज समुद्रात अंमली पदार्थ घेऊन येतात.  गुजराथमधील अड्ड्यांवर छुप्या पद्धतीने पाठवल्यानंतर अवैध मार्गाने देशातील अन्य राज्यांमध्येही त्याची वाहतूक केली जाते. गुजरात हे अंमली पदार्थांच्या तस्करीचे केंद्र बनले  आहे. या मार्गाने देशातील तरुण पिढी बरबाद केली जात आहे. काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या कारवायांपेक्षा हे भयंकर आहे. या माध्यमातून देश पोखरला जात आहे. केंद्र सरकार याकडेही लक्ष देईल काय? -मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली


मंगळवार, १६ नोव्हेंबर, २०२१

ध्येय निश्चिती


उदरनिर्वाह करणे ही एक आवश्यक परंतु कठीण प्रक्रिया आहे.  कधीकधी कमकुवत मनोबल असलेली माणसं मोडून पडतात. अन्न,वस्त्र, निवारा या चिंतेत मोठे ध्येय आणि समाजहिताचा घेतलेला संकल्पही धुळीस मिळतो. विद्यार्थी काळातला संकल्प सर्वात जास्त वेळा बदलतो, कारण त्यांच्या ध्येय साध्य करण्याचा संपर्क थेट मेहनतीशी जोडलेला असतो.  ज्यांना डॉक्टर बनण्याची इच्छा असते, पण ते कधी कधी व्याख्याते बनून जातात आणि ज्यांना अभियंता बनण्याची इच्छा आहे ते वैज्ञानिक बनतात. हा बदल साहजिक आहे कारण त्याचा संबंध परीक्षेतील यशाशी आहे.

 करिअरच्या ज्या क्षेत्रात आपण प्रवेश करतो, त्या क्षेत्रात पुढे जाण्याचे ध्येय निश्चित करणे आवश्यक आहे.  ध्येय नेहमी स्पष्ट असले पाहिजे आणि तेथे पोहोचण्याचा मार्ग खरा असला पाहिजे.  रामकृष्ण परमहंस यांच्याकडे एक वृद्ध माणूस आला.  तो म्हणाला, 'ठाकूर, खूप त्रास होतो आहे, मला मुक्ती हवी आहे.' ठाकूर हसले आणि म्हणाले,'वेड्या, तुला टॅक्स फ्री जगायचे आहे का? हा तर जगण्याचा टॅक्स आहे.  तुला जगायचं आहे, तर मग जगण्याचा टॅक्स भरायला नको का?'

सांगायचा मुद्दा असा की, आपले सत्कर्मच आपल्या जगण्याचा टॅक्स भरते. या कमाईशिवाय दुःखातून मुक्ती मिळणं कठीण आहे. नाही. त्यामुळे कोणतेही ध्येय साध्य करण्यासाठी सत्याचा मार्ग निवडला पाहिजे.  त्याच्या कमाईचा काही हिस्सा गरजू लोकांना दिला पाहिजे. हे दान म्हणजे चांगल्या कर्मांचा संग्रह असेल, आणि मन शांत ठेवण्यासाठी देखील एक चांगला पर्याय असेल.  सभ्यतेचा उदय आणि पतन आणि मोठ्या वैज्ञानिक  उपलब्धीनकडे पहा, मोठमोठ्या लक्ष्य प्राप्तीमागे एकाग्रता आणि धैर्य हेच आधार बनले आहेत. प्रत्येक ध्येय महत्वाचे आहे, जे समाजाच्या हिताचे आहे.

सोमवार, १५ नोव्हेंबर, २०२१

मितभाषी बना


जीवनात आणि व्यवहारात वाणीचे महत्त्व सर्वश्रुत आहे, पण कधी बोलावे, कधी गप्प राहावे, हे व्यावहारिक जीवनातील यशाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठरते.  काहीही विचार न करता बोलल्याने जास्त नुकसान होते. महात्मा गांधी म्हणायचे की कमी बोलण्याने मला दोन फायदे होतात - एक, मी जे काही बोलतो ते खूप विचार करून बोलतो आणि दुसरे, माझे अज्ञान इतरांसमोर येऊ शकत नाही.  सुज्ञ लोकांनी खूप चिंतनानंतर हे सूत्र दिले आहे की जेव्हा तुमचे शब्द मौनापेक्षा चांगले सिद्ध होऊ शकतात तेव्हाच बोला.  पंडित श्रीराम शर्मा म्हणाले की, अनावश्यक शब्द वापरल्याने व्यावहारिक जीवन गुंतागुंतीचे होते, नातेसंबंधात तेढ निर्माण होते आणि गैरसमज निर्माण होतात.वाईट शब्दांमुळे कुटुंब आणि मित्रांमध्ये मतभेद होतात आणि जर ते व्यवस्थित हाताळले नाही तर हिंसाचार, बदला, युद्धे आणि भयंकर संघर्षांची परिस्थिती निर्माण होते.  महाभारताचे युद्ध हे वाणीच्या एका छोट्याशा घसरण्याचे परिणाम होते.  तेव्हा द्रौपदीच्या मुखातून दुर्योधनाविरुद्ध अपशब्द निघाले होते.

त्यामुळे मितभाषीपणा हा सर्वसामान्य प्रमाण मानला गेला आहे. मितभाषिपणा आपल्याला अनावश्यक चुकांपासून वाचवतो.  यामुळे उर्जेचा अनावश्यक अपव्यय देखील टाळता येतो.  त्यातून आपल्या व्यक्तिमत्त्वाला गांभीर्य प्राप्त होते.  व्यवहारात चुका कमी होतात. मितभाषी माणसाला विचार करण्याची आणि विचारण्याची पुरेशी संधी असते आणि त्याला स्वतःला तोलून-मापून बोलणे शक्य होते. यामुळे नातेसंबंधदेखील सुधारतात आणि एका यशस्वी आनंदी जीवनाचा पाया घातला जातो.


लाडक्या मुलाच्या हातात मोबाईल देताना काळजी घेतली पाहिजे


खेळण्याच्या मोहात किंवा कमी समज असल्याने मुले गेम ऍप अथवा अन्य गोष्टींवर  क्लिक करतात.त्यामुळे पालकांच्या बँक खात्यातून पैसे कट होऊ शकतात. त्यामुळे मुलांच्या हातात गेमिंगसाठी मोबाईल देताना सावधगिरी बाळगा अन्यथा आर्थिक फटका बसू शकतो.  त्यामुळे मुलांच्या हातात मोबाईल देताना काळजी घेतली पाहिजे.आपल्याला हवे ते अॅप 'गुगल प्ले स्टोअर'वर मिळतात. शेकडो पेड व्हर्जन मोबाईल अॅपचे ऑनलाइन पेमेंट करून डाऊनलोड करावे लागतात. गेम अॅपचे कनेक्शन आपल्या युपीआय आयडी,  नेट बँकिंग, फोन पे आणि गुगल पे अशा पेमेंट सिस्टिमला असते. मुलांना याबाबत कल्पना नसल्यामुळे ते असे  अॅप थेट डाऊनलोड करतात. परंतु,  त्यामुळे पालकांच्या बँक खात्यातून  पैसे कट होतात. अनेकांना ही भानगड  माहिती नसल्यामुळे पालकांच्या  खात्यातून रक्कम वजा होत असल्याने  मोठा आर्थिक फटका बसला असल्याची उदाहरणे आहेत.  लहान मुलांच्या हातात मोबाईल  दिल्यानंतर ते यू-ट्युब व्हिडिओ  पाहतात किंवा गेम खेळतात. मुले गेम  डाऊनलोड करण्यासाठी थेट गुगल प्ले स्टोअरवर जातात. त्यांना दिसेल ते गेम डाऊनलोड करण्यास सुरवात करतात. आपले बँक खाते मोबाईल नंबरशी जुळलेले असल्यामुळे मोबाईलवरूनच आता मोठ्या प्रमाणात बँकेचे व्यवहार केले जातात. तसेच दुकानातील किंवा हॉटेलमधील पेमेंट करण्यासाठी फोन पे, गुगल पे, पेटीएमचा वापर केला जातो. त्यामुळे हे सर्व अॅप्स बँक खात्याशी नेहमी जोडलेले असतात. गुगल प्ले स्टोअरवर असे शेकडो गेम अॅप आहेत की जे ऑनलाईन पेमेंट करून डाऊनलोड करावे लागतात. त्या गेम्सची किंमत अमेरिकन डॉलर्समध्ये असते. एकामागे एक गेम्स डाऊनलोड केल्यामुळे आपल्या बँक खात्यातून रक्कम कपात होते. ऑनलाइन गेम बनविणाऱ्या कंपनीच्या आंतरराष्ट्रीय खात्यात पैसे जात असल्यामुळे त्याचे एसएमएस मोबाईलवर येत नाहीत. त्यामुळे मुलांनी डाऊनलोड केलेल्या गेम्स ऍपचे पैसे थेट बँक स्टेटमेंटमध्ये दिसून येतात. परंतु अनेकांना बँक स्टेटमेंट पडताळण्याची सवय नसते.त्यामुळे गेमिंग ऍपमुळे वजा झालेले पैसे समजून येत नाहीत. अनेक फ्री दिसणाऱ्या गेमींग अॅपमध्ये मुलांना आकर्षित करण्यासाठी आभासी वेपन, जॅकेट, कॅप, सुरक्षा चक्र, मॅजिक पिस्टल, बुलेट हे कॉइन विकत घेण्यास भाग पाडतात. त्या कॉइनची किंमत 100 रुपयांपासून ते 1000 रुपयांपर्यंत असते. कॉइन खरेदी केल्यास 'मॅजिक गिफ्ट'सुद्धा मिळते. त्यामुळे मुले आकर्षित होऊन आभासी वेपनवर क्लिक करतात. त्या त्या वेळी पेमेंट सिस्टीमला जोडलेले पालकांच्या बँक खात्यातून रुपये कपात होतात आणि आर्थिक फटका बसतो. त्यामुळे वेळोवेळी बँक बॅलन्स चेक केले पाहिजे आणि मोबाईलवरील विविध ऍपची तपासणी केली पाहिजे. मुलांनी काय कोणते नवीन ऍप डाऊनलोड केले नाही ना याची खात्री करून घेतली पाहिजे.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

जिल्हा परिषद कर्मचार्‍यांनी काय घोडं मारलंय?


महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचार्‍यांनी राज्य शासनामध्ये विलीनीकरणाची मागणी लावून धरली आहे. यासाठी त्यांनी बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले आहे. या मागणीसाठी राज्य सरकारने एक समिती गठीत केली आहे. ही समिती आता यावर निर्णय घेणार आहे. आता त्याच धर्तीवर जिल्हा परिषद कर्मचार्‍यांनादेखील राज्य सरकारी कर्मचार्‍यांचा दर्जा देण्यासाठी समिती गठीत करायला हवी आहे. जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी काय घोडं मारलं आहे. राज्य सरकारी कर्मचार्‍यांप्रमाणे जिल्हा परिषद कर्मचार्‍यांना वेतन व भत्ते मिळत असले तरी अनेक महत्त्वपूर्ण सवलतींपासून जिल्हा परिषद कर्मचारी वंचित आहेत. राज्य सरकारी कर्मचार्‍यांचे पगार कोषागारमधून एकत्रित निधीतून करण्यात येत असून, राज्य शासनाच्या अनुदानासाठी प्रतीक्षा करण्याची गरज नाही. तर जिल्हा परिषद कर्मचार्‍यांना प्रत्येक महिन्यात अनुदानाची वाट पाहावी लागते, तर राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून दर महिन्यात वित्त विभागाकडे मागणी करावी लागते, यासाठी बराच कालापव्यय होतो व त्याचा भुर्दंड कर्मचार्‍यांना सोसावा लागतो. जिल्हा परिषद कर्मचार्‍यांना राज्य सरकारी कर्मचार्‍यांचा दर्जा दिल्यास वेतनासाठी हात पसरविण्याचे आवश्यकता भासणार नाही. राज्य शासनाचा जिल्हा परिषद कर्मचार्‍यांचा आकृतीबंधमध्ये तफावत असून, राज्य कर्मचार्‍यांना झुकते माप दिले आहे. राज्य कर्मचार्‍यांना जीआर निघाल्यावर निर्णय लागू होतो. तर जिल्हा परिषद कर्मचार्‍यांना प्रत्येकवेळी ग्रामविकास विभागाचा निर्णयाची वाट पाहावी लागते. जिल्हा परिषद कर्मचार्‍यांना निमशासकीय कर्मचारी संबोधले जात असल्यामुळे अनेक सवलती शासनाकडून नाकारल्या जास्त जातात. त्यामुळे त्यांना राज्य कर्मचार्‍यांना दर्जा देण्याचा राज्य सरकारने गांभीर्याने विचार करायला हवा.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली