बुधवार, १७ नोव्हेंबर, २०२१

गुजरात अंमली पदार्थांच्या तस्करीचे केंद्र


गेल्या काही दिवसांपासून गुजरातमधून अमली पदार्थ जप्त केल्याच्या आणि काहींना अटक झाल्याच्या बातम्या येत आहेत.  शिवाय, नुकत्याच मुंबईत एका क्रूझ जहाजातून अमली पदार्थ जप्त केल्याच्या प्रकरणाने या प्रश्नाकडे संपूर्ण देशाचे लक्ष वेधले आहे.  परवा सोमवारी गुजरातमधील दहशतवादविरोधी पथकाने सव्वाशे किलोग्राम हेरॉईन जप्त केले आणि तीन जणांना अटक केली.  आंतरराष्ट्रीय बाजारात एवढ्या मोठ्या प्रमाणात करण्यात आलेल्या कारवाईतील हेरॉईनची किंमत सहाशे कोटींहून अधिक असल्याचे सांगण्यात येत आहे.  यापूर्वी गेल्या काही दिवसांत गुजरात पोलिसांनी अंमली पदार्थांच्या दोन मोठ्या खेपा जप्त केल्या होत्या.
त्याच वेळी गुजरात दहशतवादविरोधी पथकाने 2016 पासून आतापर्यंत एकोणीस हजार कोटी रुपयांहून अधिक किमतीचे अंमली पदार्थ जप्त केले आहेत.  त्यातच यावर्षी नऊशे कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले.  या दरम्यान सत्तरहून अधिक जणांना अटकही करण्यात आली.  गुजरातमधील मुंद्रा बंदरातूनच सुमारे तीन हजार किलो अमली पदार्थ जप्त करण्यात आले.  छुप्या गुन्हेगारी कारवाया आणि प्रत्येक स्तरावर पाळत ठेवल्याचा दावा करणाऱ्या सरकारच्या आणि त्याच्या पोलिसांच्या डोळ्यांसमोर इतक्या मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थांच्या तस्करीचे जाळे कसे उभं राहिले, हा प्रश्नच आहे!
 गुजरातची किनारपट्टी हा पाकिस्तान, इराण किंवा अफगाणिस्तानमधून भारतात करण्यात येणाऱ्या अंमली पदार्थांच्या तस्करीसाठी पसंतीचा मार्ग बनला आहे.  तस्कर पाकिस्तानातून कच्छ किंवा गुजरातमधील भुज समुद्रात अंमली पदार्थ घेऊन येतात.  गुजराथमधील अड्ड्यांवर छुप्या पद्धतीने पाठवल्यानंतर अवैध मार्गाने देशातील अन्य राज्यांमध्येही त्याची वाहतूक केली जाते. गुजरात हे अंमली पदार्थांच्या तस्करीचे केंद्र बनले  आहे. या मार्गाने देशातील तरुण पिढी बरबाद केली जात आहे. काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या कारवायांपेक्षा हे भयंकर आहे. या माध्यमातून देश पोखरला जात आहे. केंद्र सरकार याकडेही लक्ष देईल काय? -मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा