रविवार, ७ नोव्हेंबर, २०२१

मोदींना फक्त सत्ता मिळवण्याचा ध्यास


देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आगामी पाच राज्यातल्या विधानसभा निवडणुका भाजपच जिंकेल ,असा विश्वास (लोकसत्ता दि.8 नोव्हेंबर) केला आहे. दिल्लीतल्या पक्ष कार्यकर्त्यांच्या बैठकीत त्यांनी कार्यकर्त्यांना सामान्य माणूस आणि पक्ष यांच्यातील सेतू बनण्याचे आवाहन करतानाच सेवा,संकल्प आणि समर्पण ही भाजपची तत्त्वे असल्याचे नमूद केले आहे. उद्योगाजकांची सेवा करणं, शेतकऱ्यांना आयुष्यातून उठवणं हा संकल्प आणि सत्तेसाठी ' कायपण' हा समर्पण भाव भाजपचा आहे. काँगेसमुक्त भारत करतानाच भाजपने शेतकरीमुक्त भारत करण्याचा अजेंडा स्वीकारला आहे की काय,कळायला मार्ग नाही. पेट्रोल-डिझेलचा भाव आंतरराष्ट्रीय बाजाराच्या तेलाच्या दरावर अवलंबून असल्याचे सांगणाऱ्या भाजप सरकारने नुकत्याच झालेल्या पोट निवडणुकीच्या पराभवाच्या धक्क्यातून सावरताना पेट्रोल आणि डिझेलचे दर पाच ते पंधरा रुपयांनी स्वस्त केले. यावरून दरवाढीचा बचाव खोटा असल्याचे समोर आले आहे. इथे एक गोष्ट नमूद केली पाहिजे की, सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर कुठेच क्रूड ऑईलच्या दरात कुठलीही घट झालेली नाही तरीही भाजप सरकारने तेलाचे भाव कमी केले. म्हणजे पेट्रोल -डिझेलचा भाव भाजप सरकार ठरवते आणि ते निवडणुकीच्या ऐन मोसमात करते, हे दिसून आले आहे. मागे पश्चिम बंगालसह अन्य राज्यात निवडणुका होणार होत्या ,या काळात तेलाच्या किमती स्थिर ठेवण्यात आल्या आणि निवडणुका संपल्यावर पुन्हा दररोज तेल दरवाढ होऊ लागली. 

लोकांच्या भेडसावणाऱ्या मुद्द्यांचा भाजपने विचार केल्याचे अजिबात दिसून येत नाही. तरीही ते कार्यकर्त्यांना पक्ष आणि जनता यांच्यात विश्वासाचा सेतू म्हणून काम करण्याचे सांगतात,हे हास्यास्पद आहे. उत्तर प्रदेश, हरियाणा,पंजाब या राज्यांमध्ये शेतकरी आंदोलन चांगलेच पेटले आहे. या ठिकाणी संतापलेले शेतकरी भाजप नेते,मंत्री यांच्यावर,त्यांच्या गाड्यांवर हल्ले करत आहेत. भाजप कार्यकर्ते आणि नेतेमंडळींना अनेक गावांमध्ये,शहरांमध्ये फिरायला मज्जाव करण्यात आला आहे. त्यांना तोंड लपवून फिरावे लागत आहे. असे असताना भाजप कार्यकर्ते कसला सेतू उभा करणार आहेत? मोदींना कार्यकर्त्यांबरोबर बोलायला वेळ आहे,पण देशातल्या प्रश्नांवर संवाद साधायला वेळ नाही. याचा अर्थच असा की, त्यांना फक्त सत्ता महत्त्वाची आहे. त्यांना काँग्रेस मुक्त भारत करायचा आहे पण दुर्दैवाने प्रत्येक ठिकाणी काँग्रेस 'गले की हड्डी'  बनून पुढे येत आहे. नुकत्याच झालेल्या पोट निवडणुकीत काँग्रेसचे यश त्यांच्या जिव्हारी लागल्याने त्यांना नाईलाजाने पेट्रोल-डिझेलचे दर कमी करावे लागले आहेत. पण जनता आता भाजपचा कावा ओळखून आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, मणिपूर राज्यातले लोक आगामी काळातल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला याचा नक्कीच दणका बसेल, असे दिसते.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा