गुरुवार, ११ नोव्हेंबर, २०२१

तिसऱ्या लाटेकडे लक्ष असू द्या


कोरोना व्हायरसमुळे युरोपची पुन्हा एकदा वाईट परिस्थितीत झाली असल्याच्या बातम्या येत आहे.  तिथे कोविड संसर्गाची प्रकरणे सातत्याने वाढत असल्याचे एएफपी या वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार दिसून येत आहे. या अहवालानुसार जर्मनीमध्ये गेल्या 24 तासांत कोविडचे 50 हजार नवीन रुग्ण आढळले आहेत.  जर्मनीतील या संसर्गाने गेल्या पाच महिन्यांचा विक्रम मोडला आहे. ब्रिटनमध्येही कोरोनाचा हाहाकार माजत आहे. या बातम्यांनुसार युरोपात तिसऱ्या आणि चौथ्या लाटेची शक्यता व्यक्त केली जात आहे. भारतानेही याकडे लक्ष ठेवून नियोजन करायला हवे. निवडणुका,यात्रा आणि जत्रा यांचे नियोजन करताना कोरोना नियमांचे काटेकोर पालन कसे होईल,याकडे लक्ष दिले पाहिजे. दोन्ही डोस पूर्ण करण्याबरोबरच शाळा व महाविद्यालयातील मुलांना डोस तातडीने मिळण्याच्या दृष्टीने नियोजन व्हायला हवे आहे. प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना अद्याप लस उपलब्ध झाली नाही. त्यांना शाळेतच लस कशी उपलब्ध होईल,हे पाहावे लागणार आहे. ज्यांनी दोन डोस पूर्ण केले आहेत, त्यांच्यासाठी बूस्टर डोसचे नियोजन व्हायला हवे आहे. तिसरी लाट उसळण्यापूर्वीच त्यावर निर्बंध कसे घालता येईल,याची तयारी आता पासूनच व्हायला हवी. आपण दुसऱ्या लाटेकडे दुर्लक्ष करून निवडणुका घेत बसलो. त्याचा फटका आपल्याला चांगलाच बसला आहे. दुसऱ्या लाटेत मृत्यूचे प्रमाण मोठे होते. 

पहिली लाट शहरात मोठ्या प्रमाणात पसरली तर दुसऱ्या लाटेने ग्रामीण भागाची अवस्था वाईट करून सोडली. तिसरी लाट मुलांसाठी धोकादायक असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे या सगळ्या बाबींचा विचार करून सर्वच पातळीवर अगोदरच नियोजन आणि व्यवस्था करून ठेवायला हवी आहे.

जर्मनीच्या रॉबर्ट कोच इन्स्टिट्यूटने आपल्या अहवालात म्हटले आहे की ज्यांना लसीकरण केलेले नाही आणि ज्यांना लसीचा एकच डोस मिळाला आहे, त्यांना संसर्गाचा धोका जास्त आहे.  कोविड-19 विरुद्ध लोकांना अधिक प्रतिकारशक्ती देण्यासाठी जर्मनीच्या आरोग्यमंत्र्यांनी बूस्टर डोससह देशातील लसीकरण मोहीम अधिक तीव्र करण्याचे आवाहन केले आहे.  यासोबतच देशात तपासाची संख्या वाढवण्यावरही त्यांनी भर दिला आहे. पहिली व दुसरी लाट उन्हाळ्याच्या प्रारंभाला भारतात आली होती. याचा अंदाज घेऊन काही लोक तिसरी लाट जानेवारी ते मार्च 2022 याच काळात येईल, असे म्हणत आहेत. संभाव्य धोका लक्षात घेऊन लोकांनी यात्रा,उत्सव, विवाह सोहळे साजरे करताना अंतर, मास्क आणि सॅनिटायझर या नियमांचे पालन करावे. यात खंड पडू देऊ नये. तिसरी लाट आल्यास पुन्हा आपल्या देशात अनेक व्यवसाय, उद्योग यांना मोठा फटका बसणार आहे. दोन लाटेत देशातील 17 कोटी मध्यमवर्गीय लोक दारिद्र्य रेषेखाली गेल्याचे आकडेवारी सांगत आहे. तिसरी लाट आल्यास आणखी मध्यमवर्गीय दारिद्र्य रेषेखाली जातील. गरिबांच्या पोटापाण्याचा प्रश्न मोठा गंभीर होईल. या सगळ्या गोष्टींचा विचार करून शासन,प्रशासन आणि समाजातील प्रत्येक घटकाने काळजी घेतली पाहिजे.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा