गुरुवार, ४ नोव्हेंबर, २०२१

40 टक्के महिलांना उमेदवारी देण्यामागे तर्क काय?


प्रियांका गांधी यांची उत्तर प्रदेशातील आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर नवीन घोषणा म्हणजे 'लड़की हूं, लड सकती हूं'.  याचा अर्थ उत्तर प्रदेशातील एकूण 403 विधानसभा जागांपैकी काँग्रेसच्या 161 महिला उमेदवार दिसणार आहेत. मात्र  काँग्रेसच्या या 40  टक्के महिलांना उमेदवारी देण्यामागचा तर्क काय आहे,हे समजलेले नाही.

उत्तर प्रदेशातील महिलांविरुद्धच्या गुन्ह्यांवर नजर टाकल्यास, नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या अहवालानुसार 2017 मध्ये महिलांविरोधातील 56011 गुन्ह्यांची नोंद झाली असल्याचे दिसून येईल. तर 2019 मध्ये त्यांची संख्या वाढून 59853 झाली आहे.  प्रियंका गांधी यांनी ते चांगल्या प्रकारे समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे.  दुसरी गोष्ट अशीही असू शकते की उत्तर प्रदेशात सपा, बसपा आणि इतर पक्षांमध्ये महिलांकडे विशेष लक्ष दिले जात नाही.  त्यामुळे कदाचित  निवडणुकीपूर्वीच या पक्षांच्या नाराज महिला नेत्या काँग्रेसच्या दरबारात जाऊ शकतात.  सध्या उत्तर प्रदेशातील एकूण 14.66 कोटी मतदारांपैकी महिला मतदारांची संख्या 6.70 कोटी आहे, परंतु  दुर्दैवाची बाब अशी की, सध्या उत्तर प्रदेश विधानसभेत फक्त चाळीस महिला आमदार आहेत. याठिकाणी काँग्रेसमध्ये सध्या एकही तगडा महिला नेता नाही.  विधानसभेत तर सध्या त्यांच्याकडे एकमेव महिला आमदार आहे.  प्रियंका गांधी उत्तर प्रदेशातील 40 टक्के जागांसाठी गुन्हेगारी पीडितांना उभे करण्याचा प्रयत्न करतील हे प्रियंका गांधींच्या विधानावरून समजू शकते.  मात्र आगामी विधानसभा निवडणुकीत महिला सक्षमीकरणाचा कोणता नवा अध्याय लिहिला जाईल हे मात्र नंतर कळू शकेल.

उत्तर प्रदेशात महिलांच्या हिताचा पुरस्कार करणाऱ्या काँग्रेसमध्ये देशपातळीवर महिलांवर जबाबदारी सोपविण्याबाबत पार उदासीनता दिसून येते.  काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांच्या यादीत हरियाणाच्या कुमारी सेलजा यांच्याशिवाय तुम्हाला एकही महिला प्रदेशाध्यक्ष म्हणून दिसत नाही. तर  काही राज्यांमध्ये कार्याध्यक्ष म्हणून मोजक्याच महिला कार्यरत आहेत.  युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी क्वचितच महिला आहेत.  काँग्रेसच्या निवडणूक प्राधिकरणाच्या पाच सदस्यांमध्ये केवळ एक महिला सदस्य दिसते आहे आणि काँग्रेसच्या कोअर ग्रुप कमिटीच्या सात सदस्यांमध्ये एकही महिला नाही.  प्रियांका गांधी यांची विचारसरणी जर राज्य पातळीवर चांगली असेल, तर राष्ट्रीय पातळीवर त्यांची विचारसरणी इतकी वेगळी का आहे?

प्रियांका गांधींनी फक्त उत्तर प्रदेशातच 40 टक्के महिलांना उमेदवारी देण्याची घोषणा का केली?  उत्तर प्रदेशसोबतच पंजाब, गोवा, मणिपूर आणि उत्तराखंडमध्येही विधानसभा निवडणुका होणार आहेत.  प्रियंका गांधी या राज्यांकडे विशेष लक्ष का देऊ इच्छित नाहीत?  ते या राज्यातील महिलांचा विचार का करत नाहीत?  प्रियांका गांधींना महिला सक्षमीकरणाच्या दिशेने नवे चित्र निर्माण करायचे असेल तर त्यांनी प्रत्येक राज्यात 40 टक्के महिला उमेदवार उभे करण्याची घोषणा केली पाहिजे.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा