मंगळवार, ९ नोव्हेंबर, २०२१

मोबाईलचा 'पॅटर्न लॉक' ठरतोय मदतीला अडसर


रात्री-अपरात्री प्रवास करताना अपघातात गंभीर जखमी झालेल्यांना वेळेत मदत मिळाल्यास त्याचा जीव वाचू शकतो. मात्र, संबंधित वाहनचालक व प्रवासी गंभीर जखमी झाल्यानंतर त्याच्या मोबाइलच्या पॅटर्न लॉकमुळे वेळेत मदत करता येत नसल्याचे अनेकदा समोर आले आहे.  त्यामुळे प्रवास करताना लोकांनी मोबाइलला 'पॅटर्न लॉक' ठेवू नये. आपल्या देशात रस्ते अपघाताचे प्रमाण मोठे आहे,शिवाय यातील मृत्यूचे प्रमाणही अन्य कारणांच्या तुलनेत अधिक आहे.  मोबाइल टॉकिंग,  विरुध्द दिशेने वाहन चालविणे,  क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी अथवा माल वाहतूक करणे, वेगाने व हयगयीने वाहन चालविणे, मद्यपान करून वाहन चालविणे अशा प्रकारांमुळे सर्वाधिक अपघात होत आहेत. यातल्या अनेकांना वेळेत मदत न मिळाल्याने जीव गमवावा लागतो. राष्ट्रीय महामार्गाची कनेक्टिव्हीटी वाढल्याने वाहनांचा वेग वाढला आहे. बेशिस्त वाहनांवर कारवाई करूनही अपघात कमी झालेले नाहीत. तरीही, अपघातानंतर वेळेत मदत करता यावी यादृष्टीने सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. दुसरीकडे वाहनचालकांनी मोबाइलला शक्यतो पॅटर्न लॉक टाकू नये. 'मोबाईल पॅटर्न'मुळे वेळेत मदत मिळत नाही  आणि नाहक जीव जातो. सोलापुरातील पोलिसांनी याबाबतची एक ताजीच घटना सांगितली आहे. यातून लोकांनी बोध घ्यायला हवा.  दिवाळीनिमित्त खरेदी केलेले फटाके फुसके निघाल्याने एक तरुण फटाके बदलून आणायला सावळेश्वर (ता.मोहोळ) येथून बार्शी येथे गेला. रात्री नऊच्या सुमारास बार्शीहून परत येताना बार्शीजवळच पाच-सहा किलोमीटर अंतरावर त्याच्या दुचाकीला मोठ्या वाहनाने समोरुन धडक दिली.  अपघातानंतर तो गंभीर जखमी होऊन रस्त्यालगत पडला. बघ्यांची मोठी गर्दी त्याठिकाणी झाली, परंतु त्याच्या मोबाइलला पॅटर्न लॉक असल्याने कोणालाच संपर्क करता आला नाही. काहीवेळाने त्याच्या मोबाइलवर कॉल आला आणि अपघात झाल्याची माहिती संबंधित नातेवाईकाला देण्यात आली. नातेवाईक त्याठिकाणी येईपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. असे होऊ नये, म्हणून लोकांनी प्रवासावेळी तरी मोबाईला पॅटर्न लॉक न करण्याची काळजी घ्यायला हवी.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा