शुक्रवार, १९ नोव्हेंबर, २०२१

युवकांनी सोशल मीडियापासून सावध राहावे


अनेकांना सोशल मीडियावर सक्रिय राहण्याची सवय असते.त्यामध्ये उच्चशिक्षित युवकांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. मात्र या लोकांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की,धार्मिक, राजकीय, देशविरोधी विषयांवर पटकन रीऍक्ट होण्याची सवय आणि भावनेच्या भरात किंवा अनावधानाने का होईना सोशल मीडियावर एकाद्या चुकीच्या पोस्टमुळे संपूर्ण करिअर बरबाद होऊ शकते. त्यामुळे भविष्याचा सारासार विचार करूनच सोशल मीडियावर पोस्ट करावी. सध्या देशात हिंदू, मुस्लिम, शीख, इसाई, दलित अशी धार्मिक-जातीय असे एकमेकांविरोधी असल्याचे वातावरण तयार केले जात आहे. पुढे याचा वापर राजकीय स्तरावर एकागठ्ठा मतांसाठी होतो.तर देश विरोधी लोक या ऑनलाईन माध्यमाने घरबसल्या आपल्या देशातील सामाजिक सहिष्णुता आणि सौहार्द  यांचे नुकसान करतात. देशातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात आणून अराजकाची परिस्थिती निर्माण करून देशाची प्रगती खंडित होईल असा त्यांचा मानस असतो.यात सामान्य माणसाचे आणि देशाचे नुकसान होते.

कुणीतरी माथे भडकवणारी पोस्ट फेसबुक, ट्विटर आणि व्हॉटस अपवर टाकते आणि त्या पोस्टची कोणतीही शहानिशा न करता थेट शेअर करून ते व्हायरल करण्यावर काही बेजबाबदार लोकांचा, युवकांचा भर असतो. त्यावर अनेकांच्या तिखट प्रतिक्रिया असतात.अशा पोस्ट मुद्दामहून व्हायरल करण्यात येतात,जेणेकरून सामाजिक शांतता भंग होईल.त्यामुळे युवा वर्गाने आपली सदसद्विवेकबुद्धी जागृत ठेवावी. आणि अशा पोस्टापासून लांब राहावे. कुणाच्या कटाला बळी पडू नये.

जर एखाद्या उच्च शिक्षित युवकाने सोशल मीडियावर पोस्ट टाकली आणि ती देश विरोधी कारवाया, धार्मिक दंगलीस कारणीभूत, अश्लील, राजकीय द्वेष पसरवणारी असल्यास पोलीस थेट आयटी ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करतात. त्यानंतर युवकाला अटक,जामीन, न्यायालयीन लढाई, सुटका अशा अनेक प्रक्रियेचा सामना करावा लागतो. त्यामुळे तो शासकीय, खासगी नोकरीसाठी पात्र ठरत नाही. कोणत्याही शासकीय मंडळामध्ये त्याला स्थान मिळवता येत नाही. तसेच पासपोर्ट मिळवण्यात अडचणी येतात व विदेश प्रवास करता येत नाही.

विशिष्ट संघटना, काही राजकीय पक्ष किंवा समाजकंटक यांच्या विशेष छुप्या आयटी टीम कार्यरत असतात. त्यांचे केवळ समाज विरोधी, देशविरोधी मजकूर तयार करून सोशल मीडियावर व्हायरल करण्याचे काम असते. त्यांच्या या कटाला युवा वर्ग पटकन बळी पडतो आणि स्वतःचे नुकसान करून घेतो. अशा आक्षेपार्ह पोस्टामुळे समाजाचे-देशाचे नुकसान होत असल्याने अशा पोस्ट दिसून आल्यास त्या ऍपवर जाऊन त्यांचा रिपोर्ट करावा. त्यामुळे अशा आक्षेपार्ह पोस्ट फेसबुक, व्हॉटस अप, इन्स्टंग्राम, ट्विटर यावरून काही मिनिटांतच बंद होऊ शकतात किंवा संबंधित ऍप त्यास बॅन करू शकते.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा