गुरुवार, ९ जून, २०२२

मिताली राजचे यश नजरेत भरणारे


भारतीय महिला क्रिकेटचा डंका जगात पिटणाऱ्या विक्रमादित्य मिताली राजने वयाच्या 39 व्या वर्षी घेतलेली निवृत्ती चटका लावणारी आहे. ती गेली 23 वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत होती. या दरम्यान ती भारतातील महिला क्रिकेटची ठळक आणि न मिटणारी ओळखही बनली. ती एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारी खेळाडू तर आहेच ,पण कर्णधार म्हणून सर्वाधिक विजयही तिच्याच नावावर आहेत. एकदिवसीय सामन्यांमध्ये 7805 धावा केल्या आहेत. तिच्या नावावर 7 शतके आणि 64 अर्धशतके आहेत. वनडेत सर्वाधिक धावा करणारी मिताली राज (भारत) - 232 सामने,7805 धावा, 50.68 सरासरी, सी. एडवर्डस (इंग्लंड) - 191 सामने' 5992 धावा, 38.18 सरासरी, सारा टेलर (वेस्ट इंडिज) - 145 सामने ,5298 धावा, 44.15 सरासरी आहे. एकूण 317 सामन्यांमध्ये 10 हजार 337  धावा ही कामगिरी विक्रमादित्य बिरुद पटकावण्यासाठीही पुरेसे ठरावे.  मितालीने तिच्या संदेशात पुढे लिहिले की, मी जेव्हा जेव्हा मैदानात उतरले तेव्हा मी : नेहमीच सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न केला आणि संघाला विजय मिळवून देण्यावर लक्ष केंद्रित केले. आता भारताचे भविष्य युवा खेळाडूंच्या हातात सुरक्षित आहे. अनेक वर्षे संघाचे कर्णधारपद भूषवणे ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट होती. याकाळाने मला एक व्यक्‍ती म्हणून उत्तम बनवलं, तसंच महिला क्रिकेटलाही पुढे नेलं. 

भारतीय मुलींना एक नव्या क्षेत्राचे स्वप्न मितालीने दाखवले. आज मागे वळून बघताना तिने इतर सर्वसाधारण ' मुलीप्रमाणे जर भरतनाट्यमलाच प्राधान्य दिले अंसते तर? असा प्रश्न मनात येतो. पण तिथे मिताली डोळ्यासमोर उभी राहते. कोणत्या पुरुष क्रिकेटपटूचा खेळ तुला आवडतो? या एका पत्रकाराच्या प्रश्नाला तिने तुम्ही कधी पुरुष खेळाडूला कोणत्या महिला क्रिकेटपटूचा खेळ आवडतो? असा प्रश्न विचारला आहे का? असे विचारले होते. स्त्रियांच्या कामगिरीकडे इतक्याच तीव्र जाणिवेने पहावे हे आपल्या प्रश्नातून सांगणारी मिताली, क्रिकेटच्या मैदानावर बॅटिंगची प्रतीक्षा करत किंडलवर पुस्तक वाचणारी मिताली अशी तिची अनेक रूपे देशाने पाहिली. आपल्याही मुलीने असे बनले पाहिजे, असा विचार अनेक पालकांच्या मनात आला असेल, तो तिच्या धवल कारकिर्दीमुळेच! य़ा कारकिर्दीला क्रिकेटमधील पुरुष खेळाडूंच्या कारकिर्दीशी तोलून पाहिले तर तिचे यश नजरेत अधिक भरते. भारतीयच नव्हे तर जगातील क्रिकेट रसिक तिच्या या कारकिर्दीकडे नेहमीच आदराने पाहतील आणि तिच्या आदर्शाचे गोडवे भविष्यात ही गायले जातील यात शंकाच नाही. आता यापुढे एक खेळाडू म्हणून नव्हे तर तज्ञ म्हणून तिच्या अनुभवाचा फायदा भारतीय महिला क्रिकेटला मिळावा आणि जगात भारतीय क्रिकेटचे नाव अधिक उज्ज्वल व्हावे,हीच अपेक्षा! -मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा