रविवार, ५ जून, २०२२

'ईडी'- 'आयटी'च्या कारवाया संशयास्पदच!


काँगेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि त्यांचे पुत्र राहुल यांना नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात ईडीने नोटीस बजावली आहे. यामुळे काँगेस अस्वस्थ झाली आहे. तिकडे दिल्लीतील सत्ताधारी आम आदमी पक्षाचे नेते आणि आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांना 'ईडी'ने अटक केली आहे. महाराष्ट्रात महाआघाडीचे दोन मंत्री अनिल देशमुख आणि नवाब मलिक तुरुंगाची हवा खात आहेत. महाराष्ट्र सरकारला ईडीने अक्षरशः घाम फोडला आहे. रोज कोणत्या ना कोणत्या चौकशा सुरू आहेत. वास्तविक गेल्या दोन वर्षांपासून विरोधकांवर ईडी-आयटीच्या धाडी मोठ्या प्रमाणात पडत आहेत. विरोधी नेत्यांच्या भवितव्याचा चुराडा करण्याचे हे अभियान आहे. जेव्हा न्यायालय निकाल देईल तेव्हा देईल पण तोपर्यंत चांगलाच विलंब झालेला दिसेल. नेत्यांवरील आरोप बिनबुडाचे होते असे काही बाबतीत निष्पन्न होईलही परंतु तोपर्यंत त्या नेत्यांच्या माथ्यावर लागलेला कलंक कायम राहणार आहे. केंद्र सरकार विरोधकांवरील जी कारवाई करत आहे,ती निपक्ष आहे असे म्हटले तरी यात भाजपच्या नेत्यांवर कुठली कारवाई होताना दिसत नाही.म्हणजे भाजपचे नेते धुतल्या तांदळासारखे स्वच्छ आहेत का? कित्येक विविध  राजकीय पक्षांच्या लोकांना भाजपने पक्षात घेऊन त्यांना प्रामाणिकपणाचे सर्टिफिकेट दिले असल्याची चर्चा रंगत आहे. यामुळे विरोधकांकडून मोदी-शहा यांना लक्ष्य केले जात आहे. भाजपाचे लोकसभेत 300, राज्यसभेत 95, विधानसभांमध्ये 1376 आणि विधान परिषदेत 154 असे एकूण 1925 सर्वाधिक खासदार, आमदार आहेत. त्यांच्यावर ईडी, आयटीवाल्यांनी कुठल्या नोटिसा किंवा कारवाया केल्याचे ऐकिवात नाही. इथे त्यांना कुणीच भ्रष्ट दिसत नाही. ही गोष्ट 'हजम' होत नाही. त्यामुळे सरकारी यंत्रणांच्या कारवाया संशयास्पदच वाटतात.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली
दैनिक लोकमत 9 जून 2022



दैनिक संकेत टाइम्स दिनांक 8 जून 2022


दैनिक लोकसत्ता दिनांक 8 जून 2022


दैनिक सुराज्य दिनांक 8 जून 2022


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा