शुक्रवार, ३० डिसेंबर, २०२२

वाघ वाढले,पण जंगल तेवढेच!


(दैनिक सकाळ मतमतांतरे दि.31/12/2022)

वाघांच्या आणि वन्यजीवांच्या हल्यात मानवाच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. वाघ-मानव संघर्षात वाघांचे मृत्यू होतात; तसेच मानवांचे मृत्यू सुद्धा होतात. अलीकडे शिकारी कमी झाल्या असल्या तरी वाघांच्या अपघाती मृत्यूत वाढ झाली आहे. परंतु आज खरी समस्या वाघांच्या आणि वन्यजीवांच्या हल्ल्यात मानवाच्या मृत्यूचे प्रमाण वाढले,हे आहे. 2022 मध्ये वाघ आणि वन्यजीव यांच्या हल्ल्यात 106 लोकांचा बळी गेला आहे. वाघांचा जन्मदर दुपटीने वाढला तर वाघांच्या हल्ल्यात मरणाऱ्यांची संख्या 16 पटीने वाढली.  महाराष्ट्रात वन्यजीवांच्या हल्ल्यात 2017 मध्ये 50 लोकांचा बळी गेला. 2018 आणि 2019 मध्ये अनुक्रमे 36 आणि 32 लोकांचा मृत्यू झाला होता. 2020 मध्ये हा आकडा 88 वर गेला, मात्र 2022 मध्ये हा आकडा 106 वर गेला आहे.  कोविडच्या लॉकडाऊनमुळे लोकांचा जंगलातील हस्तक्षेप वाढला होता. आता तर त्यात चांगलीच वाढ झाली आहे. वाघांच्या हल्ल्यातील मानवी मृत्यूत महाराष्ट्र देशात आघाडीवर असून पश्चिम बंगाल दुसऱ्या क्रमांकावर आहे. राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाच्या आकडेवारीनुसार 2014-20 दरम्यान वाघांच्या हल्ल्यात देशात 310 लोकांचा मृत्यू झाला. त्यात

महाराष्ट्रात 99 तर पश्चिम बंगालमध्ये 78 लोकांचा मृत्यू झाला होता. यावरून विदर्भात हा संघर्ष किती वाढला आहे .देशातील व्याघ्र प्रकल्पात चांगले संरक्षण होऊ लागल्याने वाघांची संख्या वाढली आहे. परंतु कमी होत चाललेली जंगले, वाघांचे तुटलेले भ्रमण मार्ग, मानवाचा आणि गुराढोरांचा जंगलातील मुक्त  वावर, जंगलाच्या तुलनेत वाघांची वाढलेली संख्या, जंगलातील गावाची संख्या अशा अनेक कारणांमुळे वाघ-मानव संघर्षात वाढ होत असून त्यातून वाघ आणि मानव यांचे मृत्यू वाढू लागले आहेत. लोकांचे निरीक्षण असे की, जंगलाच्या क्षमतेपेक्षा वाघ जास्त झाले आहेत. बछडे मोठे झाले की जंगलाबाहेर पडून माणसांवर हल्ले करतात. वाघांच्या प्रजननाचा कालावधी आधी अडीच वर्षांचा होता आता तो सव्वा वर्षांवर आला आहे.  2014 मध्ये महाराष्ट्रात 190 वाघ होते. 2018 मध्ये ही संख्या 312 वर पोहचली. 2021 मध्ये 350 आणि 2022 मध्ये वाघांची संख्या 400 झाली आहे. वाघांची संख्या वाढू लागली आहे, त्या प्रमाणात जंगलांचे प्रमाण वाढलेले नाही. भक्ष्य आणि पाणी यासाठी वाघांना जंगलाबाहेर पडावे लागत आहे. वाघांच्या हल्ल्यात अशीच मनुष्य बळी वाढली तर मात्र अन्यथा जन आक्रोश वाढेल. यावर कायमची उपाययोजना होणे आवश्यक आहे. वाघांच्या संरक्षणाचा प्रश्नही अनुत्तरित राहील. महत्त्वाचे म्हणजे वन आणि वन्यजीव संरक्षणात जोपर्यंत स्थानिक लोकांचा सहभाग आणि सहकार्य राहणार नाही, तोपर्यंत कायमस्वरूपी उपाययोजना करता येत नाही. लोकांची मने जिंकून लोकसहभागातून वन्यजीव व्यवस्थापन यशस्वी होऊ शकते.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा