आपल्या देशात मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक कचरा निर्माण होत आहे.त्याची विल्हेवाट लावणे आव्हान बनत चालले आहे.मात्र बेंगळूर,गोवा, तामिळनाडू या राज्यांमध्ये प्लॅस्टिकपासून रस्ते बनवण्याचे प्रयोग सुरू झाले आहेत. आपल्या महाराष्ट्रातही प्लॅस्टिकपासून रस्ते बनवण्याची कार्यवाही व्हायला हवी आहे. मागे पुण्यात असे प्रयत्न होत असल्याचे वाचनात आले होते, मात्र त्याचे पुढे काय झाले समजायला मार्ग मार्ग नाही.राज्य शासनाने व संबंधित यंत्रणांनी यात अधिक लक्ष घालून हा प्रकल्प पूर्णत्वास आणावा,जेणे करून राज्यातील मोठ्या प्रमाणात वाढलेला कचरा याकामी वापरला जाईल आणि राज्य प्रदूषणापासून वाचेल.
प्लॅस्टिक कचर्याचा वापर करून ग्रामीण रस्ते बांधण्याच्या मार्गदर्शक सूचना 2007 मध्ये केल्या गेल्या होत्या.परंतु त्याची अंमलबजावणी होत नसल्याचे निदर्शनास येत आहे.प्लॅस्टिक कचरा (व्यवस्थापन आणि हताळणी) नियम 2011 नुसार सर्वच महापालिका व नगरपरिषदांनी योग्य तंत्रज्ञानाचा वापर करून प्लॅस्टिकचा पुनर्वापर रस्ते बांधणीसाठी करावा, असे अपेक्षित असताना याला कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद कोठूनही मिळत नाही, हे दुर्दैवी म्हणावे लागेल. रस्त्यांवर होणारा कोट्यवधींचा खर्च वाचवून ग्रामीण भागात चांगल्या रस्त्यांचे जाळे निर्माण करण्यासाठी प्लॅस्टिकच्या कचर्यांपासून रस्ते बनवण्याची योजना सर्वचदृष्टीने लाभदायक आहे. परदेशात प्लॅस्टिकपासून निर्माण होणार्या रस्त्यांचे प्रमाण मोठे आहे.यामुळे कमी खर्चात रस्ते होणार आहेत. शिवाय यामुळे पर्यावरणाची होणारी गंभीर हानी टाळता येणार आहे.त्यामुळे प्लॅस्टिकपासूनच्या रस्ते कामाला वेग येण्याची गरज आहे. शासनाने व महापालिका, पालिका यांनी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा