रविवार, ७ ऑक्टोबर, २०१८

नागरिकांकडून ई कचर्‍याची साठवणूक


आपल्याकडे बाजारात नव्या वाढीव क्षमतेसह सातत्याने नव-नवे टीव्ही,कॉम्प्युटर, लॅपटॉप, मोबाईल यांशिवाय अन्य डिवाईस उपलब्ध होत आहेत. त्यामुळे साहजिकच जुने डिवाईस एक तर अडगळीत जातात किंवा त्याचा वापर कमी होऊन ते खराब होतात. पण इतके झाले तरी ते घरातच जपून ठेवले जातात. अलिकडच्या काळात प्रत्येकाच्या घरात चालू-बंद असलेले चार-पाच मोबाईल सहज दिसतील. कारण त्याची विल्हेवाट कशी लावायची आपल्याला माहितीच नाही. एक्सचेंजमध्ये काही वस्तू जातात,मात्र त्याला एक्सचेंज ऑफर नसेल तर मात्र त्या वस्तू आपल्याकडे पडून राहतात. काही खराब डिवाईस रस्त्यावरच फेकून दिल्या जातात. त्यामुळे आपण आपल्या घरात आणि दारात ई-कचरा करून पर्यावरण धोक्यात घालवत आहोत. या वस्तू जाळल्यास त्यातून विषारी धूर बाहेर पडून त्याचा आपल्याच शरीराला त्रास होतो. खरे तर अशा वस्तूंची व्यवस्थित विल्हेवाट लावण्याची आवश्यकता आहे.पण आपण त्याकडे अजूनही गांभिर्याने पाहत नाही. घरातल्या आणि इलेक्ट्रॉनिक दुकानांमधून अशा वस्तूंचा  -कचरा वाढत चालला आहे.
अलिकडेच एका सर्व्हेक्षणानुसार दहापैकी आठ भारतीयांना ई-कचर्याबाबत माहिती आहे, पण 50 टक्के लोक वापरात नसलेली डिव्हाइसेस पाच वर्षांपर्यंत साठवून ठेवत असल्याचे आढळून आले आहे. सेरेब्रा ग्रीनच्या ई-कचरा सर्व्हेक्षणाची माहिती ई-कचरा व्यवस्थापनातील अग्रगण्य अशा सेरेब्रा ग्रीन आणि एमएआयटी यांनी संयुक्तपणे केलेल्या सर्व्हेक्षणानुसार, -कचरा म्हणजे नेमके काय, आणि त्याची विल्हेवाट लावण्यासाठी विशेष उपाययोजना आवश्यक असल्याची जाणीव 80 टक्के भारतीयांना आहे. मात्र, पर्यायी मार्गांच्या अऩुपलब्धतेमुळे अयोग्य साधनांद्वारे ई-कचर्याची विल्हेवाट लावण्याची प्रवृत्ती या नागरिकांमध्ये आढळते, असेही या सर्व्हेक्षणातून उघड झाले आहे. -कचर्याची विल्हेवाट लावण्यासाठी स्थानिक कचरा गोळा करणारे हे योग्य पर्याय वाटत नसल्याचे मत सर्व्हेक्षण करण्यात आलेल्या 68 टक्के लोकांनी व्यक्त केले, तर सर्व्हेक्षणातील 72 टक्के सहभागींनी, स्थानिक कचरा गोळा करणारे आमच्या भागातील ई- कचरा उचलत नसल्याचे सांगितले. 50 टक्के लोकांनी असे सांगितले की, त्यांच्याकडे वापरात नसलेले दोन किंवा त्यापेक्षा अधिक डिव्हाइसेस आहेत, जे ते पाच वर्षांपर्यंत जमा करून ठेवतात. त्यामुळे सदोष विल्हेवाटीची शक्यता वाढते.
स्थानिक प्रशासनही (नगरपालिका-महापालिका) याकडे गांभिर्याने पाहताना दिसत नाही. याची वेगळी वर्गवारी करून हा ई-कचरा स्वतंत्र गोळा करावा व त्याची विल्हेवाट स्वतंत्ररित्या करण्यात यावी,याबाबत सर्वत्र उदासिनता दिसून येत आहे. मुळात ओला कचरा आणि सुका कचरा गोळा करण्याबाबत अद्याप जागृती दिसून येत नाही. या कचर्यातून ऊर्जा निर्मिती करण्याचा प्रयत्न काही ठिकाणी सुरू असला तरी याबाबतीत अजूनही सर्वस्तरावर प्रगती झालेली नाही. मग ई-कचर्याबाबत काय प्रगती असणार आहे? खरे तर शासनाने याबाबत कडक धोरण राबवण्याची आवश्यकता आहे. खराब झालेले डिवाईस कुठेही टाकून दिले जातात. मग कुणी त्याला जाळतं किंवा जनावरांच्या पोटातही जातं. यामुळे हानी ही नागरिकांचीच होते. त्यामुळे ई-कचर्याबाबत जनजागृती करण्याची आवश्यकता आहे.-मच्छिंद्र ऐनापुरे,जत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा