टोमॅटोची योग्य काढणी, प्रतवारी आणि शीत साठवणूकीद्वारे (डीप फ्रिजर) 20 ते 30 दिवसांपर्यंत टोमॅटो उत्तमरित्या टिकवून ठेवतात. चीनमध्ये जेव्हा
फळभाज्या अथवा इतर फळांचे भाव कमी असतात, तेव्हा शेतकरी फळांची पक्वता रोखण्यासाठी विशिष्ट संप्रेरकांचा सौम्य फवारा मारतात, जेणेकरून
बाजारात योग्य भाव येताच शेतकऱ्यांना फळांची तोडणी करणे शक्य होते. त्यासाठी सरकार सर्व प्रकारची मदत करते. तिथे शेतकऱ्यांनी उत्पादित
केलेल्या नाशवंत फळे व भाज्यांची साठवण करण्यासाठी अद्ययावत शीतगृहेदेखील आहेत. आपल्याकडे अशाप्रकारचे संशोधन झाल्यास टोमॅटो उत्पादकांबरोबर व्यापारी, निर्यातदार तसेच प्रक्रियादार अशा मूल्य साखळीतील सर्वांनाच उपयुक्त ठरेल असे आहे. महत्वाचे म्हणजे हे संशोधन प्रत्यक्षात आल्यास त्याच्या विस्तारास टोमॅटो पट्ट्यातून अनेक बाजार
समित्या पुढे येतील. त्यामुळे या संशोधनाचे काम शक्य तेवढ्या लवकर सुरु व्हायला हवे.यासाठी शासनाने आर्थिक तरतूद करून प्रोत्साहन द्यायला हवे. सध्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या टाळेबंदीमुळे देशात शेतमाल विशेषतः फळे-भाजीपाला यांचे अपरिमित नुकसान झाले आहे.तांदूळ, गहू यांचे उत्पादन भरमसाठ झाल्याने आणि पाऊसमान चांगले झाल्याने अन्नधान्य तुटवडा जाणवला नाही. मात्र यानिमित्ताने काही गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत. शेतमाल जास्त काळ टिकवण्यासाठीची गरज प्रकर्षाने जाणवली. त्यामुळे याकडे यासाठीचे संशोधन वाढीस लागण्याची गरज आहे. -मच्छिंद्र ऐनापुरे, जत
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा