भारतात आरोग्य सेवा कुचकामी आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालये यांची अवस्था वैद्यकीय अधिकारी,कर्मचारी आणि औषधांचा तुटवडा आणि सुविधांअभावी अत्यंत केविलवाणी झाली आहे. आरोग्याची सरकारी यंत्रणा मृत्यू शय्येवर असताना खासगी दवाखाने मात्र नागरिकांना लुटताना दिसत आहेत. साहजिकच देशातील वैद्यकीय सेवा महागडी बनली आहे. ही सेवा सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरची असून त्यामुळे योग्य उपचाराआभावी भारतातला मृत्यू दर हजार जन्मांमागे 30 असा आहे.
हा दर चीन, अमेरिकासारख्या देशाच्या तुलनेत सुमारे पाचपट अधिक आहे. हे आकडे आपल्या देशातील आरोग्य यंत्रणेची लक्तरे वेशीवर टांगणारी आहेत. त्यातच देशात नवनवीन आजार धुमाकूळ घालत असून त्यांना नियंत्रणात आणण्याचे मोठे आव्हान असताना सरकार मात्र यासाठी काही करायला तयार नाही. आरोग्यावर आणि शिक्षणावर भारतात फार कमी खर्च केला जात आहे. कॅन्सर, टीवी ,हृदय रोगसारख्या आजारांवर अजूनही उपचार महागडे आहेत. त्यामुळे मृत्यूचे प्रमाण आपल्याकडे अधिक आहे. अमेरिकेत 1हजार जन्मांमागे6,चीनमध्ये7, फ्रान्स 3 आणि जपान 2 असा मृत्यू दर आहे. भारतात मात्र हा दर हजार जन्मांमागे 40 असा मृत्यू दर आहे. चौथी महासत्ता म्हणून भारताचा उल्लेख केला जात असला तरी येथील वाढती बेकारी, कुचकामी आरोग्य सेवा देशाला कुठे नेवून ठेवणार आहे माहीत नाही. सध्या आर्थिक मंदीची लाट असून सरकार मात्र सगळे आलबेल असल्याचे चित्र लोकांसमोर उभे करत आहे. देशाला मिसगाईड करण्याचा प्रयत्न असून यामुळे आपणच आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेणार आहोत. सरकारने आरोग्याबाबत दूरदृष्टी ठेवून यंत्रणा राबवण्याची आवश्यकता असून ग्रामीण भागात अत्याधुनिक सुविधा आणि अल्पदारात उपचार उपलब्ध करून द्यायला हवे. आरोग्य विभागात नोकर भरती आणि मुबलक औषध पुरवठा आणि त्याचबरोबर तात्काळ उपचार सेवा द्यायला हवी. तरच मृत्यू दर आटोक्यात येणार आहे.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत (सांगली) 7038121012
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा