अलिकडे गणेशोत्सवाचे स्वरूप वरचेवर व्यावसायिक होत चालले आहे. बहुसंख्य गणेशोत्सव मंडळांचे पैसे उभारण्याचे मार्ग बदलले आहेत. त्यांनी चक्क आमदार, खासदार आणि नगरसेवकांना गाठायला सुरुवात केली आहे. या लोकांना गाठून लाखाचा आकडा टाकला की, दारोदार फिरून पैसे गोळा करण्याची काही गरजच रहात नाही. दारोदार फिरून वर्गणीची हा आकडा मिळत नाही. नेते मंडळीही नाहीतरी निवडणुकीत पैसे वाटतच असतात. तेव्हा त्यतोच पैसा गणेश मंडळे अशा स्वरूपात मिळवत आहेत.
गणेशोत्सवातून लोक शहाणे होतात असे लोकमान्य टिळकांचे म्हणणे होते. त्याचा प्रत्यय वर्गणीची नवी युक्ती पाहायला मिळत आहे. दुसरी आयडिया आहे प्रायोजकांची. काही कंपन्यांनाही आता गणेशोत्सव आपल्या जाहिरातीला अनुकूल असा दिसायला लागला आहे. कंपन्या मंडळांना सहाय्य करत आहेत. शिवाय उत्पन्नाचा आणखी एक मार्ग आहे तो म्हणजे पूजेचा. रोज सकाळी आणि संध्याकाळी कोणातरी पाहुण्यांच्या हस्ते सपत्नीक पूजा केली जाते. जो भक्कम वर्गणी देईल तो पूजेचा मानकरी होतो. त्यामुळे काही मंडळे लाखोंच्या पैशांत लोळत आहेत. त्यांचा थाटामाट ही मोठा आहे.
यातून सामान्यांची सुटका होत असल्याचे वाटत असले तरी हा पैसा सामान्य माणसाच्याच खिशातून नकळतपणे आणि अप्रत्यक्षपणे अलगदपणे काढलेला असतो. हे या सामान्य माणसाला कळत नाही. तो अज्ञानात आनंदी असतो. या सार्या बदलात लोकमान्य टिळकांनी हा उत्सव कशासाठी सुरू केला याचे मात्र सर्वांना विस्मरण होत आहे. परंतु, काही ठिकाणी आशादायक चित्र आहे. काही मंडळे वर्गणीचा उरलेल्या पैशाचा सदुपयोग करताना दिसतात.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत 7038121012
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा