प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन यांनी नुकतेच आपले यकृत 75 टक्के निकामी झाले असल्याचे जाहीरपणे सांगितले आहे, आणि हे सांगताना त्यांनी आपण अगदी ठणठणीत असल्याचे म्हटले आहे. याशिवाय मला टीबी आणि हेपेटायटीस-बी झाल्याचे सांगताना वाईट किंवा अपमानास्पद वाटत नाही, असेही स्पष्ट केले आहे. टीबीबद्दल जागरूकता संदेश देताना ते स्वतःचे आपले उदाहरण देत असतात.
इथे महत्त्वाचा मुद्दा असा की, त्यांचे यकृत गेल्या 20 वर्षापूर्वीच 75 टक्के निकामी झाले आहे. ते 25 टक्केच काम करत आहे. पण त्यांच्या प्रकृतीवर काहीच परिणाम झाला नाही. ते आजही तेवढ्याच दमाने काम करत आहेत, व्यस्त आहेत, जेवढे 20 वर्षांपूर्वी कामात व्यस्त होते. यकृत 85 टक्के निकामी झाले असले तरी माणूस जगू शकतो, असे एका डॉक्टरने सांगितले होते.पण त्याला काही पथ्ये पाळावीच लागतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मद्यपानापासून दूर राहायला हवे. दैनंदिन व्यवहाराचा काटेकोरपणा पाळायला हवा. यावेळी मला माझ्या एका खास मित्राची प्रकर्षाने आठवण होते. त्यांना पिण्याचे व्यसन होते. फार पूर्वी त्याला टीबीही झाला होता. दोन वर्षापुर्वी त्रास होत असल्याने त्याला उपचारासाठी दाखल केल्यावर त्याचे यकृत 80 टक्के निकामी झाले असल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. नंतर त्याने दारूही सोडली होती. सर्व काही सुरळीत चालले होते. मात्र त्याने काही महिन्यातच आत्महत्या केली. त्याने याची हाबकी खाल्ली होती की काय कळायला मार्ग नाही. पण अमिताभचा आजचा संदेश त्यावेळी त्याला मिळायला असता तर जगला असता, असे मला वाटते. अमिताभ बच्चन यांनी आपला आजार जाहीर करून फार मोठे काम केले आहे. यातून त्यांचे मोठेपण समोर येते.-मच्छिंद्र ऐनापुरे, सांगली 7038121012
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा